व्हॉट्सऍप कट्टा   

ऋतू
 
ऋतू वसंत चिडला 
देई चिखलास दोष 
म्हणे बघा पांडुरंगा
नाही पावसाला होश
 
कसे वीज वारा मेघ
हातघाईवर आले
करे विठ्ठल विचार 
काय पावसाला झाले 
 
गारा वेचता विठ्ठल
गहिवरला पाऊस
दया क्षमा विनवणी 
करू लागला प्रभूस
 
ऋतू मास विसरलो 
थोडा वागलो विचित्र 
निसर्गाच्या दबावात 
विठू हरवले सूत्र 
 
विठ्ठलाने पावसाचे 
आधी केले लाडकोड
हात घेऊन हातात 
म्हणे हट्ट आता सोड
 
ऋतू चक्र जरा बघा
कशापायी घाईघाई
अवकाळी पावसाने
थांबवावी दांडगाई
 
नाही वसंत फुलला
उन्हं गुडुपच झाली
तान कोकीळेची गोड 
नाही माझ्या कानी आली
 
जाई जुई मोगर्‍याचा
हरवला परिमळ
राजा फळांचा नासला
गेले रसातील बळ
 
पशुपक्षी गोंधळले
सांभाळावे अवकाश
वर्षा ऋतूत वरूणा 
यावे पुन्हा सावकाश 
 
प्राची गडकरी, डोंबिवली
मो. ९९८७५६८७५०
---
एकदा एक राजा दाट जंगलात हरवून जातो, जिथे त्याला खूपच तहान लागते. इकडे तिकडे सर्व जागी शोधल्यावर सुद्धा त्याला कुठे पाणी मिळत नाही. तहानेमुळे त्याचा घसा सुकतो, त्याची नजर एका झाडावर पडते, जिथे एका फांदीवरून थोडे थोडे पाण्याचे थेंब पडत होते. तो राजा त्या झाडाजवळ जाऊन खाली पडलेल्या पानांचे द्रोण बनवून त्या थेंबांनी द्रोण भरू लागला. जसे तसे जवळजवळ खूप वेळ लागल्यावर तो द्रोण भरला आणि राजा प्रसन्न होऊन जसे त्या पाण्याला पिण्यासाठी द्रोण तोंडाजवळ घेतो तेव्हाच तिथे समोर बसलेला एक पोपट आवाज करत आला. त्या द्रोणावर झडप मारून परत समोरच्या दिशेने बसला. त्या द्रोणातील पूर्ण पाणी खाली पडले.
 
राजा निराश झाला, खूप प्रयत्नानंतर पाणी मिळाले होते आणि तेही पक्ष्याने पाडले; परंतु आता काय होऊ शकते. असा विचार करून परत तो रिकामा द्रोण भरू लागतो. खूप मेहनतीनंतर पुन्हा ते द्रोण परत भरतो आणि राजा परत आनंदित होऊन जसे त्या पाण्याला प्यायला द्रोण तोंडाजवळ घेतो तर तो बसलेला पोपट आवाज करत येतो आणि द्रोणावर झडप मारून पाणी पाडून परत समोर बसतो. असे दोन-तीन वेळा होते.
 
आता राजा हताश होऊन क्रोधित होतो, इतक्या परिश्रमाने पाणी एकत्र केल्यावरही हा दुष्ट पक्षी असा वागतोय, आता मी याला सोडणार नाही. आता हा जेव्हा परत येईल तेव्हा याला संपवून टाकेन. असे मनातल्या मनात ठरवतो. राजा आपल्या हातात चाबूक घेऊन परत तो द्रोण भरू लागतो. खूप वेळेनंतर त्या द्रोणात पाणी भरते तेव्हा राजा पिण्यासाठी त्या द्रोणाला उंच करतो आणि तो पोपट परत आवाज करत जसा त्या द्रोणाला झडप मारण्यासाठी जवळ येतो तसेच राजा चाबूक पोपटावर मारतो आणि त्या पोपटाचे प्राण घेतो.
 
आता राजा विचार करतो की, या पोपटापासून तर पिच्छा सुटला; परंतु असे थेंब थेंब करून कधी परत द्रोण भरू आणि कधी माझी तहान विझवेन. म्हणून जिथून हे पाणी पडत आहे तिथे जाऊन पटकन पाणी भरतो. असा विचार करून तो राजा त्या फांदीजवळ जातो, जिथून पाणी पडत होते. तिथे जाऊन जेव्हा राजा बघतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते. कारण त्या फांदीवर एक भलामोठा अजगर झोपलेला होता आणि त्या अजगराच्या तोंडातून लाळ पडत होती. राजा ज्याला पाणी समजत होता ती अजगराची विषारी लाळ होती. राजाला पश्चाताप होऊ लागतो, हे देवा! मी हे काय केले. जो पक्षी सतत मला विष पिण्यापासून वाचवत होता, क्रोधामुळे मी त्यालाच मारून टाकले. हे देवा! मी नकळत किती मोठे पाप केले आहे. राजा दुःखी होतो.
 
रागात व्यक्ती दुसर्‍यासोबत आपल्या स्वतःचे खूप नुकसान करून घेतो. राग ते विष आहे ज्याची निर्मिती अज्ञानतेमुळे होते आणि अंत पश्चातापाने होतो. म्हणून नेहमी रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे. अति राग आणि भीक माग ही मराठीतील म्हणच बरेचसे काही बोलून जाते. रागावर नियंत्रण ठेवणेच चांगले.

Related Articles